दहावी-बारावी परीक्षेची फी विद्यार्थ्यांना परत मिळणार?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून नियोजित असलेली दहावी बारावी बोर्ड परीक्षा 2020-21 ही ऐनवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता रद्द करावी लागली होती. गेल्या वर्षी दहावी-बारावीची परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या शुल्काचा अंशतः परतावा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावी परीक्षा रद्द केल्या होत्या. दरम्यान, राज्य मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्क परत करावे लागणार आहे.यासाठी शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांकडून विद्यार्थ्यांची माहिती मागवण्यात आली आहे.

माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचा तपशील 12 नोव्हेंबर सकाळी 11 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरायचा आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांनी  http://feerefund.mh-ssc.ac.in/ या लिंकवर भरायचा आहे

बारावीच्या विद्यार्थ्यांनी https://feerefund.mh-hsc.ac.in/ या संकेतस्थळावरून / लिंकव्दारे नोंदणी करणे आवश्यक आहे.

दहावी बारावी बोर्ड परीक्षा ही जरी त्यावेळी रद्द झाली होती. तरी या परीक्षेचे तयारीचे काम पूर्ण झाले होते. सोबतच प्रश्नपत्रिका सुद्धा छापून तयार होत्या. त्यामुळे मंडळाला यासाठी जमा झालेल्या परीक्षा शुल्कातून खर्च करावा लागला होता. त्यामुळे हा खर्च विचारात घेऊन अंशतः परीक्षा शुल्काचा परतावा हा विद्यार्थ्यांना दिला जाईल. मागील सहा महिन्यांपासून जमा असलेले परीक्षा शुल्काचे कोट्यावधी रुपये शिक्षण विभागाने तातडीने परत करावे अशी मागणी वारंवार केली जात होती. अखेर आता हे परीक्षा शुल्क परत केले जात आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.