कल्याण, लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपीलजी मोरेश्वर पाटील यांचा भव्यदिव्य नागरी सत्कार व खान्देशरत्न भास्कराचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा २०२१ शनिवार दि. २७ नोव्हे रोजी सिध्दीविनायक हॉल, भोईरवाडी, कल्याण (पश्चिम) येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी नागरी सत्कारमुर्ती कपीलजी पाटील साहेब, विशेष अतिथी आमदार मंगेश चव्हाण, समारंभाध्यक्ष प्रदिप अहिरे, विशेष अतिथी म्हणून आमदार चव्हाण यांच्यासह आलेले चाळीसगावचे माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, माजी उपसभापती संजय भास्करराव पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, चाळीसगाव भाजपा सरचिटणीस जितेंद्र वाघ, अमोल चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष प्रेमनाथजी म्हात्रे, भाजपा महिला आघाडी शहरप्रमुख ज्योती भोईर, शिवसेना उपशहरप्रमुख रवि पाटील, माजी नगरसेवक वरुण पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, पुष्पलता रत्नपारखी, साधना गायकर, रवि गायकर, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील सर, कार्याध्यक्ष बापुसाहेब हाटकर, उपाध्यक्ष एन. एम. भामरे, उपाध्यक्ष एल. आर. पाटील, खजिनदार अप्पासाहेब ए. जी. पाटील, सचिव दिपक पाटील, प्रसिद्धी प्रमुख प्रकाश पाटील आणि खान्देशातील सर्व ज्ञातीमंडळाचे अध्यक्ष/सचिव यावेळी उपस्थित होते.
कोविड काळात जीवाची पर्वा न करता प्राणाची बाजी लावून काम करणाऱ्या आरएसपी शिक्षकांना आणि प्रयोगशील व उपक्रमशील गुरुवर्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी “राम राम मंडळी, कसा शेतस, बरं चालू शे ना ???” अशी आपल्या मनोगताची सुरुवात करताच उपस्थित खान्देशी बांधवांनी जोरदार टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला.
त्यानंतर आमदार चव्हाण यांनी आपले पूर्ण मनोगतच अहिराणी भाषेत केल्याने उपस्थित सर्व खान्देशी बांधव भारावले. आपल्या मनोगतात आमदार चव्हाण म्हणाले की, या कार्यक्रमाला येण्याचे प्रमुख दोन कारण होते. एक तर खान्देशी म्हणून मला येणे क्रमप्राप्तच होतं आणि दुसरं म्हणजे ज्यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जात आहे, ते खान्देशरत्न भास्कराचार्य यांची जी कर्मभूमी आहे पाटणादेवी त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मी करतो.
खान्देश ही मातृहदयी साने गुरुजी यांची कर्मभूमी बालकवी, बहिणाई चौधरी, ना. धो. महानोर यांच्या साहित्याचा दरवळ या भूमीत आहे. केळीच्या पानासारखंच खान्देशातील माणसाचं मनदेखील समृद्ध आणि हिरवेगार आहे. म्हणूनच केळीच्या पानांवर जेवतो खान्देश.. तापी – गिरणेच्या खो-याची सुपीकता आहे. खान्देशी माणुस अतिशय चिवट आणि कष्टाळु आहे. राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहे. थेट राष्ट्रपती पदावरही खान्देशी माणसाने आपल्या कर्तृत्वाची मोहोर कोरली आहे. खान्देशी माणूस नेहमी सकारात्मक विचार करुन परमुलाखतही परिस्थितीशी जुळवून घेत ऊभा राहतो. अगदी मुंबई, कल्याण, ठाणे आदी महानगरांमध्ये खान्देशी माणसाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एवढचं नव्हे तर परराज्यातही खान्देशी माणसाने झेंडे रोवले आहे.
याचं उदाहरण आपल्याला सुरत आणि बडोदा शहराचे देता येईल. येथे खान्देशी माणसाने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या शहरांच्या प्रगतीत खान्देशी माणसाचा मोठा वाटा आहे. असे म्हणणे अधिक उचित होईल. मला वाटत उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाने आयोजित केलेला हा आपला कार्यक्रम त्याचेच प्रतिक असून मी केंद्रीय मंत्री नामदार कपिल पाटील साहेब यांना विनंती केली की खान्देशी बांधवांच्या हक्काचे केंद्र उभारण्यासाठी कल्याण येथे जागा उपलब्ध करून द्यावी व त्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवाव्यात अशी मागणी देखील आमदार चव्हाण यांनी केली.