नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांसाठी नवे पतधोरण जाहीर केले. या पतधोरणात कर्जदारांना फारसा दिलासा मिळालेला नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीने अपेक्षेप्रमाणेच रेपो दर कायम ठेवला आहे. तर पुढील दोन महिन्यांसाठी रेपो रेट 5.15 टक्के राहणार असून, सलग दुसऱ्यांदा रिझर्व्ह बॅंकेने रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीची मंगळवारपासून द्विमासिक पतधोरण बैठक सुरू होती. पुढील महिन्यांसाठी रिझर्व्ह बॅंक काय धोरण अवलंबणार याकडे अर्थजगताचे लक्ष लागले होते. अखेर गुरूवारी रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण जाहीर केले. या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली.
या बैठकीत पतधोरण आढावा समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो रेट कायम ठेवण्याची भूमिका घेतली. किरकोळ वाढती महागाई आणि अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था या पार्श्वभूमीवर आरबीआयने रेपो रेट 5.15 टक्के कायम ठेवला आहे. त्यामुळे कर्जदारांना आहे त्याच व्याजदराने कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.