यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:
यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील ५० वर्षीय प्रौढ व्यक्ती हे विहिरीत पडल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेवानंद मुरलीधर भारंबे (५०) रा. डोंगरकठोरा ता.यावल असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेवानंद भारंबे हे परिवारासह डोंगरकठोरा येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते गुरुवार ३० मार्च रोजी दुपारी शेतात विहिरीजवळ असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले, त्यात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. दरम्यान या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप विठ्ठल सूर्यवंशी करीत आहे.