जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय प्राथमिक विभाग व वाघ नगर प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी रंगतरंगात सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा या संकल्पनेवर आधारित नाट्य व नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे उदघाट्न एचडी फायरचे मिहीर घोटीकर, माजी विद्यार्थी आकाश कांकरिया, केशव स्मृती समूहाचे नितीन चौधरी, जनता बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने यांच्या हस्ते करण्यात आले. विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्ष्या शोभा पाटील, सचिव रत्नागर गोरे, अविनाश आचार्य विद्यालयाच्या शालेय समिती प्रमुख व विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहकोषाध्यक्ष हेमलता अमळकर, संचालिका वैजयंती पाध्ये, मुख्याध्यापिका योगीता शिंपी व वाघनगर शाळेचे मुख्याध्यापक हेमराज पाटील, परिक्षक योगेश शुक्ल सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे, समन्वयिका सीमा पाटील यांची उपस्थिती होती.
या पहिल्या पुष्पात शिवजन्मापूर्वीची महाराष्ट्राची परिस्थिती, संतांचे कार्य, मराठीची महती, शहाजी -जिजाऊ लग्न प्रसंग, शिवजन्म इ. प्रसंग तसेच ही मायभूमी, शेतकरी गीत, मी मराठी, गोंधळ, ज्ञाना झालसी पावन, डोहाळे, पाळणा गीत इ. गीतावर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केली. तसेच शिवरायांचे बालपण व त्यांच्या बालपणी त्यांनी खेळलेले खेळ तसेच जिजाऊंनी त्यांना कशाप्रकारे घडवले त्याचे प्रत्यक्षदर्शन प्रसंगांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवबा विवाह दृश्य, रायरेश्वराची प्रतिज्ञा या प्रसंगाचे सादरीकरण करण्यात आले. मर्दानी खेळाचे सादरीकरणही विद्यार्थ्यांनी केले. ओवी, अंगाई गीत, पोवाडा, गोंधळ यावर आधारित नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगीता शिंपी व वाघ नगर विभागाचे मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच राजे शिवछत्रपती किल्ले बनवणे व चित्रकला व प्रतिकृती दालनाचे उदघाटन आर्किटेक्चर अतुल पाटील, स्वर्ण गांधी यांच्या हस्ते करण्यात आले.
किल्ले बनवणे
विवेकानंद प्रतिष्ठानच्या विविध विभागातील म्हणजेच ब. गो. शानबाग विद्यालय, काशिनाथ पलोड इंग्लिश मीडियम, सेमी इंग्रजी विभाग या सर्व विभागातील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी या एका गटातील विद्यार्थ्यांनी व आठवी, नववी, दहावी या एका गटातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांचे छोटे स्वरूप म्हणजेच किल्ले बनवणे या अंतर्गत विविध किल्ल्यांची रचना तयार केली. यामध्ये पन्हाळगड, रायगड, प्रतापगड, मुरुड, जंजिरा अशा यासारख्या अनेक किल्ल्यांची प्रतिकृती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे. यामध्ये एकूण 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यात जवळ जवळ 70 किल्ले विद्यार्थ्यांनी उभारले व सुंदर अशा पद्धतीने त्यांची सजावट उभारणी यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने सहभाग घेतला व किल्ले बनवले.
चित्रकला व प्रतिकृती प्रदर्शन
विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित चित्रकला व प्रतिकृती प्रदर्शनात शिवकालीन वस्तू, वास्तू व हत्यारे यांची हुबेहूब प्रतिकृती मुलांनी तयार केल्या. यात बिचवे वाघ नखे तलवारींचे विविध प्रकारांच्या प्रतिकृती तसेच रायगड शिवाजी महाराजांचे समाधी स्मारक मुरुड जंजिरा किल्ला प्रतिकृती हे विशेष उल्लेखनीय होते. या प्रदर्शनात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कलेचे उत्कृष्ट सादरीकरण चित्राद्वारे प्रतिकृतीद्वारे केले. या प्रदर्शनाचा विषय शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व कार्य यावर आधारित होता. प्रदर्शनामध्ये जवळपास 250 चित्रे आणि प्रतिकृती समाविष्ट होती.