संपूर्ण कुटुंबानं भीमा नदित जीवन संपवले

0

लोकशाही न्यूज नेटवर्क    
नगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबानं पारगावमध्ये भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या ३ लहान मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले. ही घटना उघडकीस आल्यानंतर घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता. पोलीस चौकशीनंतर हा प्रकार सामूहिक आत्महत्येचा असल्याचं समोर आलं आहे.
१७ जानेवारीच्या रात्री ७ जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहन उत्तम पवार, संगीता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी चार मृत व्यक्तींची नावं आहेत. शाम आणि राणी फुलवरे यांची तीन मुले गायब होती. त्यांचे मृतदेहदेखील आज भीमा नदीत सापडले आहेत. मंगळवारी १७ जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज गावातून निघाले होते. शिरूर-चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांनी उडी घेतली. १८ जानेवारीला कुटुंबातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २०, २१ आणि २२ जानेवारीला एक-एक मृतदेह आणि आज तीन मुलांचे आढळून आले.
भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ माजली आहे. मृतांमध्ये आजोबांपासून नातवाचा समावेश आहे. संपूर्ण कुटुंबाने स्वत:ला का संपवलं याबद्दल विविध तर्कवितर्क लढवले जात होते. आता या सामूहिक आत्महत्येमागचं कारण समोर आलं आहे. मुलानं नात्यामधलीच एक विवाहित मुलगी पळवून आणली. त्यामुळे त्याचे वडील संतापले होते. मुलीला २४ तासांत सोडून ये, अन्यथा कुटुंबासह विष पितो, अशी धमकी त्यांनी दिली होती.
मोहन पवार यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहतो, तर राहुल हा पुण्यात वास्तव्याला आहे. अमोलनं दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळवून आणली. या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले होते. त्या मुलीला तिच्या घरी सोडून ये, अन्यथा समाजात आपली अब्रू जाईल, असं मोहन यांनी अमोलला फोन करून सांगितलं. मात्र अमोल ऐकला नाही. त्यानंतर मोहन यांनी राहुलला फोन केला. आपण कुटुंबासह आत्महत्या करत असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर राहुलनं त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो स्विच्ड ऑफ होता. यानंतर कुटुंबातील सदस्यांचे मृतदेहच हाती लागले.
मुलानं कुटुंबातील विवाहित तरुणी पळवून आणल्याच्या रागाचतून वडिलांसह कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं. पती, पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह ३ मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगावमध्ये ही घटना घडली. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.