जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
वाघूर धरणाच्या (Waghur Dam) भिंतीजवळ असलेल्या झाडाला गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण रामकृष्ण कोळी (वय ३४, रा. कंडारी ता. जळगाव) असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात शनिवारी 3 डिसेंबर रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अरुण कोळी हा तरुण जळगाव तालुक्यातील कंडारी येथे वास्तव्यास होता. तो १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घरातून निघून गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला. अरुणचे काका बापू कोळी यांच्यासह नातेवाईक परिसरातील जंगलात अरुणचा शोध घेत असताना ते वाघूर धरणाच्या परिसरात गेले. दरम्यान याठिकाणी धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या झाडाला अरुण याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
तात्काळ या घटनेची माहिती बापू कोळी यांनी नशिराबाद पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.