स्मार्ट फोन दुधारी तलवार : तंत्रस्नेही बरोबर तंत्र समजून घेणे गरजेचे – डॉ. सोमनाथ वडनेरे

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्यातील अविवेकी वापरामुळे तो दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे. असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले. रोटरी कल्ब, रोटरेक्ट क्लब आणि रोटरेक्ट क्लब आय.एम.आर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल गणपती नगर येथे “सायबर सुरक्षा… काल, आज आणि उद्या” विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मुख्य विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, सचिव मनोज जोशी, समिती अध्यक्ष जयेश ठाकूर उपस्थित होते. आपल्या संबोधनात डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी वर्तमान काळातील सायबर सुरक्षेच्या महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले त्यात स्मार्ट फोन, विविध ऑनलाईन पेमेंट साधने, सोशल मीडिया, नेट बँकिग सुरक्षा आदि मुद्यांचा समावेश होता.

आज प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनने महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. घरगुती वापरकर्त्यापासून विद्यार्थी, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील सर्वच व्यक्तिं स्मार्ट फोन वापरतात. परंतु अलिकडे त्याच्या अतिवापरामुळे अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहे.

सायबर सुरक्षाबाबत वर्तमानपत्र, सोशल मीडियात प्रबोधन होऊनही सायबर गुन्ह्यास बळी पडण्याचे प्रमाण जास्त असण्याचे कारण तंत्रस्नेही सर्वच बनलेत परंतु तंत्रज्ञान वापराचे जुजबी आणि विवेकी कौशल्य, जागरुकता समाजात येणे महत्वाचे आहे. सायबर गुन्ह्यात बळी पडण्याचे मुख्य कारण तंत्रज्ञान वापरणे पण तंत्र समजवून न घेणे हेच होय.

‘स्मार्टफोन वर बाबूजी समजकर बोलना’ ही म्हणण्याची वेळ आली आहे. पूर्वी दूरध्वनी विभागाकडेच कॉल रेकार्डिंग ही अधिकृत सुविधा होती. मात्र आता स्मार्ट फोन मध्येच ऑटो कॉल रेकॉर्डिंग ही सुविधा आल्यानंतर त्याचा गैरवापर होऊ लागला आहे. आपला स्मार्टफोन हरविल्यास त्यातील कॉल रेकॉर्डिंगचा दूरूपयोग होऊ शकतो ही गंभीर बाब आहे.

वर्तमानपत्रातून आपण सायबर गुन्ह्यास बळी पडण्याच्या घटना वाचतो, मात्र तरही सुशिक्षीत लोक यास जास्त बळी पडण्याचे कारण म्हणजे एक तर अतिलोभामुळे झटपट श्रीमंत होण्याचा कल आणि दुसरे म्हणजे तंत्रज्ञानास समजून न घेण्याची उदासिनता होय.

मानसिक स्वास्थ्यासाठी आज समुपदेशक अर्थात कौन्सीलरची मदत घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र त्यापेक्षाही अधिक संख्या भविष्यात टेक्नो कौन्सिलर यांची लागणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साधनांनी मानसिक शांती, स्वास्थ्य हिरावून बसलेले शेकडो व्यक्ति आहेत त्यांना मार्गदर्शनासाठी ही संकल्पना वेगाने पुढे येत आहे. याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव, रोटरेक्ट क्लब जळगाव, रोटरेक्ट क्लब आयएमआर जळगावचे सदस्य आणि नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेश वेद यांनी तर आभार जयेश ठाकूर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.