बालवाडी ते दहावीच्या मित्रांचा भरला ३१ वर्षांनी स्नेह मेळावा

0

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेंदुर्णी येथील कोल्हटकर वाड्यात भरणाऱ्या बालवाडीचे तसेच न्यु.इंग्लिश स्कुल आताचे आचार्य बापुसाहेब गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या वर्ग मित्रांचा स्नेहमेळावा तब्बल ३१ वर्षांनी भरला होता. बालवाडीतील १९८१या वर्षातील तर दहावीच्या १९९२ या वर्षातील वर्गमित्रांचे स्नेहमेळावा भरला होता. बालवाडीच्या शिक्षिका तसेच शाळेतील गुरुजन, संस्थाचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सस्मरणीय सोहळा संपन्न झाला. देशाच्या विविध भागातुन गावात आणि शाळेत प्रवेश करून जुन्या आठवणींना उजाळा देत असतांनाच सगळ्यांंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु होते.

शेंदुर्णी येथील मित्र मैत्रिणी यांनी पुढाकार घेत सगळ्यांच्या सहकार्याने हा सोहळा शाळेत तसेच माहेश्वरी मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय गरुड तर प्रमुख अतिथी म्हणुन बालवाडीच्या शिक्षिका अंजली कोल्हटकर, संस्थेचे सचिव सतिषचंद्र काशिद, जिल्हा परिषदेच्या सदस्या सरोजिनी गरुड, संस्थेच्या संचालिका उज्वला काशिद तसेच गुरुजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शहीद, दिवंगत गुरुजन, मित्र मैत्रिणी यांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्व मान्यवरांचे स्वागत वर्ग मैत्रिणी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वर्ग मित्र मैत्रिणी यांनी आपण तब्बल ३१ वर्षांनी एकत्र आलो आहे याबद्दल बोलतांना त्यांचा कंठ दाटुन आला होता. शिक्षकांच्या आणि संस्थेच्या प्रति सगळ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत रथोत्सव, यात्रोत्सवाचा मुहुर्तावर हा स्नेह मेळावा आयोजित केला याबद्दल स्थानिक वर्ग मित्र मैत्रिणी यांना धन्यवाद दिले.

यावेळी गुरुजनांचे वतीने अंजली मावशी कोल्हटकर तसेच दहावीच्या वर्गात शिक्षक असलेले डी.बी.पाटील सर यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत जुने विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत असतांना ते जेव्हा भेटतात तेव्हा होणारा आनंद आणि समाधान खुपच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी माजी मुख्याध्यापक एस.बी.पाटील सर हे येऊ शकले नाही मात्र त्यांनी आपला संदेश आशिर्वाद पाठवला होता त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव दाजीसाहेब सतिषचंद्र काशिद यांनी सांगितले की, शेंदुर्णीत आतापर्यंत झालेल्या सर्व गेट टु गेदरच्या गर्दीचे रेकॉर्ड या ठिकाणी मोडले असुन एवढ्या वर्षानंतरही तुमच्या मध्ये असलेला बंधुभाव खुपच सुखद आहे. आपल्या शाळेच्या  संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन संजयदादा गरुड यांनी  हा उपक्रम एवढ्या मोठ्या संख्येने बालमित्रांच्या सह आयोजित केला. याबद्दल सर्व मित्रांचे कौतुक केले. आज तुमच्या बँचचे असंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रात विविध ठिकाणी कार्यरत आहे. मात्र तुम्ही तुमचे गाव, तुमची शाळा, संस्था विसरले नाही हीच बाब तुम्हाला अजुन मोठे करणार असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी डी.बी.पाटील सर, पी.डी.महाजन सर, वाणी मँडम, पाटील मँँडम, आर.एम.जाधव सर, व्ही.डी.पाटील सर, टी.एस.कुमावत सर, के.एस.पाटील सर , मस्कावदे सर, व्ही.वाय.सपकाळे सर, प्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, सर मुख्याध्यापक संजय उदार सर तसेच अन्य गुरुजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व वर्गमित्र, वर्गमैत्रिणी गुरुजन संस्थेचे पदाधिकारी यांना फेटा बांधण्यात आले होते.

शाळेत सर्व वर्ग मित्र मैत्रिणी दाखल झाले, जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या जुन्या वर्गात, ग्राऊंडवर जात, विविध ठिकाणी फेरफटका मारला. यावेळी सगळ्यांना एवढा आनंद होत होता की सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु दाटलेले होते. संध्याकाळी धमाल गप्पा, परिचय, विविध उपक्रम राबविण्यात आले. रात्री सर्वांनी यात्रेत जात रथाचे दर्शन घेतले. यासाठी सर्व वर्ग मित्र मैत्रिणी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.