नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या स्मरणार्थ २६ नोव्हेंबरला संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभरात राजभवन मोर्चा काढण्यात येणार आहे. एसकेएमची समन्वय समिती आणि मसुदा समितीची ऑनलाइन बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त सर्व राज्यांच्या राजधानीत शेतकऱ्यांचा राजभवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध राज्यांमध्ये राजभवन मोर्चाची तयारी सुरू असून, सर्व राज्यांमध्ये शेतकरी संघटनांच्या तयारीच्या बैठका होत असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली.
शेतकरी नेते डॉ दर्शन पाल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजभवन मोर्चाच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाशी संबंधित सर्व संघटनांची बैठक आयोजित केली जाईल. ज्यामध्ये राज्यपालांना देण्यात येणाऱ्या निवेदनाच्या मुद्द्यांवरही अंतिम निर्णय घेतला जाईल. ज्यावर समन्वय समिती आणि मसुदा समितीच्या सदस्यांमध्ये चर्चा सुरू आहे. महासभेच्या बैठकीत या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
या बैठकीत केंद्र सरकारकडून वन संवर्धन कायद्यात करण्यात येत असलेल्या दुरुस्त्यांचा निषेध करण्यात आला आणि शहीद बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनी 15 नोव्हेंबर रोजी याविरोधात देशभरात आदिवासी संघटनांकडून सुरू असलेल्या लढ्याला एकजूट दाखवण्याचा निर्णयही घेण्यात आला.