मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क
पावसामुळे रस्त्यावरील साचलेले पाणी जाण्यास वाव नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे. साकळी ते यावल जाणारा एकमेव मुख्य रस्ता असून सुद्धा या रस्त्याला गटार नाही. याचा मनस्ताप वाहनचालक आणि शाळकरी मुलांना सहन करावा लागत आहे.
साकळी फाटा ते साकळी गावात येणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरच अंजुमन उर्दू हायस्कूल व ज्यु कॉलेज सुद्धा आहे. साचलेल्या पाण्याच्या या रस्त्यावरुन विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांना पायवाट काढत जावे लागते. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना पुढील प्रवासावेळी रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघात देखील होण्याची शक्यता आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
नागरिक देखील या समस्येला वैतागले असून स्थानिक पातळीवर त्यावर काही मार्ग निघत नसल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षापासून या रस्त्याबाबत नागरिकांनी वेळोवेळी स्थानिक प्रशासन ( ग्रा.पं.) तसेच वरिष्ठांना याविषयी मार्ग काढण्याचे निवेदन दिले. मागील वर्षी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद जंजाळे, अंजुमन उर्दू हायस्कूलचे शिक्षक फैसल खानसर,अबरारसर व नागरिकांनी देखील या रस्त्यावरील पाण्यात बसून आंदोलन केले होते.
यावेळी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी लवकरच यावर निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र पूर्ण एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा या रस्यांवर पाणीही तसेच साचत आहे. मात्र प्रसासनाने व लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे हे स्पष्ट दिसते. हा एकमेव रस्ता असून देखीलत्याला गटार का नाही ? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला. तरी यावर तात्काळ मार्ग काढून विद्यार्थी व नागरिकांना होणार त्रास कमी होईल याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.