नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क ; आधीच वादात सापडलेल्या नव्या संसद भवनाच्या (New Sansad Bhavan) इमारतीच्या दर्शनी भागात नव्याने उभारण्यात आलेली प्रतिकृतीही वादात सापडली आहे. केंद्रातील मोदी सरकार हे आपल्या निर्णयांसाठी ओळखले जाते. जसे कि, GST, CAA, नोटबंदी त्याच पद्धतीने गेल्या दोन दिवसांपासून भारताचं राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या अशोकस्तंभाच्या प्रतिकृतीवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आणि याला कारणीभूत ठरलं आहे ते पंतप्रधान मोदींनी या प्रतिकृतीसमोर काढलेलं छायाचित्र! या छायाचित्रामध्ये मोदींच्या मागे दिसणारे प्रतिकृतीमधील सिंह अधिक आक्रमक आणि आक्राळविक्राळ रौद्र अस दिसत असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मूळ मानचिन्हाच्या रचनेमध्ये बदल करून मोदी सरकारने राज्यघटनेचं उल्लंघन केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून. असे सुरु असताना त्यावर आता ही प्रतिकृती घडवणाऱ्या शिल्पकारानेच याबाबत महत्वाचा खुलासा केला आहे.
नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नव्या संसद भवनाच्या समोर उभारण्यात आलेल्या या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं. मात्र, या छायाचित्रात मोदींच्या मागील प्रतिकृतीमध्ये दिसणारे सिंह अधिक आक्रमक दिसत असून ते मूळ अशोक स्तंभावरील शिल्पापेक्षा खूप वेगळे दिसत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. मूळ अशोकस्तंभ हा सारनाथ येथे आहे. तसेच, या शिल्पावर कुठेही सत्यमेव जयते हे मूळ मानचिन्हावर असणारं वाक्य देखील नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
यावर शिल्पकार सुनील देवरे काय म्हणाले ?
ही प्रतिकृती उभारण्याचं काम सुनील देवरे आणि लक्ष्मी व्यास या दोन शिल्पकारांना सोपवण्यात आलं होतं. यापैकी सुनील देवरे यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. “मूळ शिल्प आणि प्रतिकृतीमध्ये दिसणारा फरक फक्त आकार आणि विशिष्ट कोनातून काढलेल्या छायाचित्रामुळे वाटतोय. त्यामध्ये दुसरं कोणतंही कारण नाही. जर तुम्ही सारनाथमधील मूळ शिल्प पाहिलं, तर ते हुबेहूब नव्या संसदेसमोरच्या प्रतिकृतीसारखंच दिसेल”, असं सुनील देवरे यांनी म्हटलं आहे. सुनील देवरे यांनी याआधी अजिंठा आणि वेरूळमधील लेण्यांची देखील प्रतिकृती तयार केली आहे. या वादासंदर्भात बोलताना ४९वर्षीय सुनील देवरे म्हणतात, “मला शिल्पाची प्रतिकृती करण्याचं कंत्राट केंद्र सरकारकडून मिळालेलं नव्हतं. टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडून मला हे काम मिळालं होतं. त्यासाठी मी रीतसर अर्ज देखील केला होता. त्यातून माझ्या नावाची निवड झाली.” नव्या संसद भवनाच्या उभारणीचं काम टाटा प्रोजेक्ट लिमिटेडला देण्यात आलं आहे.