जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून परतल्यानंतर राज्यात उष्ण व कोरडे हवामान असून उन्हाचा चटका वाढला आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात विजा, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पावसाला पोषक हवामान झाल्याने कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित कोकण आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.