नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सद्य परिस्थितीत राज्यभरात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अद्याप सुरूच आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या सांगण्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी युती केली होती. शिवसेनेत जी फूट पडली त्यासाठी शरद पवार नाही, संजय राऊतच जबाबदार आहेत असे आठवले म्हणाले.
जेव्हा शिवसेना राष्ट्रवादीसोबत गेली, तेव्हा मी म्हणालो होते की, हे बाळासाहेबांच्या निर्णयाविरोधात झाले आहे. जर सुरुवातीलाच उद्धव ठाकरे भाजपसोबत आले असते आणि उपमुख्यमंत्रिपद घेतले असते, तर कोणतीही समस्या राहिली नसती. महाविकास आघाडी सरकार कधीच अस्तित्वात आली नसती जर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले नसते. तसेच महाराष्ट्रात खरे तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार यायला हवे होते, राष्ट्रवादी-शिवसेनेचे नाही असे आठवले म्हणाले.