लोकशाही न्यूज नेटवर्क
देशातील काही भागात सध्या चांगला पाऊस झाला आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जूनपासून आतापर्यंत देशात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षी ३० ऑगस्टपर्यंत देशात ६८९ मिमी सर्वसाधारणपणे पाऊस होत असतो, यावर्षी मात्र प्रत्येक्षात ६२७ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. केरळसह महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
केरळमध्ये पावसाची मोठी तूट
हवामान विभागानं देशात आत्तापर्यंत झालेल्या पावसाची माहिती दिली आहे. देशात सरासरीच्या ९ टक्के पाऊस कमी झाला आहे. आत्तापर्यंत देशात ९१ टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये केरळमध्ये यावर्षी पावसाची तूट पाहायला मिळत आहे. जूनपासून केरळात आत्तापर्यंत सरासरीच्या ४८ टक्के पावसाची तूट झाली आहे.
मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात पावसाची तूट
दरम्यान, मध्यमहाराष्ट्रात सरासरीच्या २२ टक्के पावसाची तूट झाल्याचे बघायला मिळत आहे. मराठवाड्यात देखील १ जूनपासून सरासरीच्या १९ टक्के पावसाची तूट पाहायला मिळत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.