लोकशाही न्यूज नेटवर्क
येथील नवीनच तयार करण्यात आलेला रेल्वे पुलाची कमी उंचीमुळे नागरीकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. कजगाव येथील मनमाड कंपनी भागात रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या लाइनसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने अनेकांना ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागते. अनेक वेळा ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना या कमी उंचीच्या पुलामुळे किरकोळ स्वरूपातील दुखापत झाल्याच्या घटनाही घडल्या आहे.
या रस्त्यावरून कजगावहून वाडे, बांबरुड व अनेक ठिकाणी रस्ता जात आल्याने तसेच या रस्त्याने शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमीन असल्याने शिवाय गावाच्या पलीकडे असलेल्या लोकवस्तीतील नागरिकांना देखील कमी उंचीच्या पुलामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या पुलाच्या उंचीसंदर्भात योग्य ते उपाय करून नागरिकांची टाळावी, अशी मागणी कजगाव परिसरातून केली जात आहे.
जुन्या पुलाप्रमाणे उंची ठेवावी
दरम्यान, या नवीनच तयार करण्यात आलेल्या पुलाबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आहे. या तक्रारी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने व संबंधितांनी तात्काळ पिलाच्या उंचीबाबत निर्णय घ्यावा, तसेच या पुलाची उंची ही जुन्या पुलाव ठेवण्याची मागणी केली जात आहे. या नवीन पुलाच्या खालून मोटारसायकल देखील जोखीम घेऊन वाकवून न्यावी लागत आहे. तर, बैलगाडी देखील घेऊन जाणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठी अडचण निर्माण होत आहे.