९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१ टक्के निकाल
पुणे ;- नुकताच बारावीच्या निकालाची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा राज्यात तब्बल ९३.३७ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. बारावीच्या निकालात यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे.
यावर्षी बारावीची परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये पार पडली. महाराष्ट्रातून यंदा बारावीची परीक्षा तब्बल १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात कोकण विभागातील ९७.५१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा ९१.९५ टक्के असा लागला आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.४४ टक्के इतकी आहे.
यंदा मुलांपेक्षा 3.८४ टक्क्यांनी जास्त मुलींची टक्केवारी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी एकूण १४ लाख ३३ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सर्व विभागीय मंडळांतून ९५.४४ टक्के (नियमित) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून ९१.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ३.८४ टक्क्यांनी जास्त आहे. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५,४४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५,०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२,४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.
या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.
खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१,३६२ एवढी असून त्यापैकी ४०,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे. या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
९ विभागीय मंडळांचा निकाल :
पुणे – ९४.४४
नागपूर – ९२.१२
छत्रपती संभाजीनगर – ९४.०८
मुंबई – ९१.९५
कोल्हापूर – ९४.२४
अमरावती – ९३.००
नाशिक – ९४.७१
लातूर – ९२.३६
कोकण – ९७.५१