पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांची भेट घेतली असून प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर थेट भाष्य केले आहे.
प्रकाश आंबेडकर हे पुण्यात भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी पोहचले होते. यावेळी पत्रकारांनी शरद पवारांच्या भेटीवर प्रश्न विचारताच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही एकत्र येणारच आहोत, अनौपचारिक, औपचारिक कुठे ना कुठे, कधी ना कधी भेट होणारच आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवण्यात आता काही अर्थ राहिला नाही. ज्यावेळी आम्ही पत्र लिहित नव्हतो. इंडिया आघाडीत सहभागी करा. त्यात राष्ट्रवादीही आहे. शिवसेनाही आहे. त्यामुळे वारंवार भेटीगाठी होत राहणार आहे. भेट झाली तर निश्चितपणे आपल्याला सांगेल.
तसेच इंडिया आघाडीत आम्हाला कधी प्रवेश द्यायचा हे त्यांनी ठरवायचे आहे.आमच्यासाठी अजून तरी दार बंद आहेत. प्रत्येकाच्या वैयक्तिक सहमतीचा प्रश्न नाही. इंडिया आघाडीचा प्रश्न आहे. ज्यादिवशी आम्ही इंडिया आघाडीत सहभागी झालो त्यानंतर या पंतप्रधानांनी गेल्या १० वर्षात देशाला कसं खोकलं केलेले आहे याचा आराखडा आम्ही मांडू. सत्तेत येणे, संविधान वाचवणे हा आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे. त्याचसोबत मराठा आणि ओबीसी समाजात जे भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते वाढणार नाही आणि त्यातून योग्य तोडगा निघेल. तसेच महाराष्ट्राची शांतता जशी आहे तशी राहिले हे पाहणे हादेखील आमचा नव्या वर्षाचा संकल्प आहे असं आंबेडकरांनी सांगितले.