लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तम आरोग्यासाठी योग व पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे. यामुळे प्रत्येकांनी रोजच्या आहारात तृणधान्यापासून बनविलेल्या विविध पदार्थांचा आहारात समावेश केला, तर विविध व्याधींपासून व्यक्ती लांब राहू शकतो, असा सूर येथील नियोजन भवनात मंगळवारी झालेल्या जिल्हास्तरीय आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यशाळेतून निघाला.
संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’, म्हणून घोषित केले आहे. पोषण मूल्यांमुळे तृणधान्याच्या आहाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यांची गणना पौष्टिक तृणधान्य अशी करण्यात आली आहे.
यामुळे तृणधान्याचे उत्पादन वाढ करून नागरिकांच्या आहारातील पौष्टिक तृणधान्याचे प्रमाण वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ही कार्यशाळा झाली.जिल्हाधिकारी अमन मित्तल, संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील, आत्मा संचालक दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ उपस्थित होते.
‘भविष्य काळातील आहार पौष्टिक तृणधान्य- एक काळाची गरज’ याबाबत आहार तज्ज्ञ डॉ. अनंत पाटील, ‘पौष्टिक तणधान्य उपपदार्थ ओळख व वापर’ यासंदर्भात पौष्टिक तृणधान्य तज्ज्ञ प्रशांत लोटके, वैभव इंडस्ट्रिजचे संचालक रोहित राठी, धुळ्याच्या अरुणिका फुड्सचे चेतन सोनवणे यांनी माहिती दिली. नंतर ‘पौष्टिक तृणधान्याबाबत समज- गैरसमज’ याबाबत नाशिकच्या कळसूबाई शेतकरी उत्पादक कंपनीच्या नीलिमा जोरवर यांनी माहिती दिली.
उत्तम आरोग्यासाठी योग व पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व योग तज्ज्ञ सीमा पाटील यांनी पटवून दितले. धुळ्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या अमृता राऊत यांनी पौष्टिक तृणधान्य पिकांचे उपपदार्थ ओळख व उपयोग याबाबत माहिती दिली.
ल्ह्यातील प्रथम कृषिरत्न पुरस्कारार्थी शेतकरी असल्याने विश्वास पाटील यांना मिलेट बास्केट देऊन गौरविण्यात आले. त्यांनी पौष्टिक तृणधान्य सेवनाबाबत मार्गदर्शन केले.
पौष्टिक तृणधान्य काळाची गरज व विविध पौष्टिक तृणधान्याचे माहिती पोस्टर्स, आरोग्यदायी बाजरीचे महत्त्व याबाबतची घडीपत्रिका, तसेच जनजागृती पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी तृणधान्याचे महत्त्व व काळाची गरज याबाबत माहिती दिली. पौष्टिक तृणधान्य महत्त्व व उत्पादन या सादरीकरणात डॉ. योगेश बन, नागणी पैदासकार (कोल्हापूर), मिलेट ऑफ द मन्थ- बाजरी याबाबत माजी बाजरी पैदासकार डॉ. हेमंत पाटील (धुळे) यांनी मार्गदर्शन केले. उपसंचालक अनिल भोकरे यांनी आभार मानले.
उपविभागीय कृषी अधिकारी दादासाहेब जाधवर (अमळनेर), आत्मा प्रकल्प उपसंचालक कुर्बान तडवी, वैभव सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत आदींच्या सहकार्याने पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त कार्यक्रम झाला.