पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
केंद्र सरकारच्या आदेशानुसार पाचोरा तालुक्यात उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एम. किसान योजनेचा लाभ पुर्ववत सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून हे ई केवायसी करण्याचे काम कुणी करावे ? यात सुरवातीला राज्य शासनाचा कृषी विभाग व महसूल विभाग यांच्यात वाद सुरू झाला होता.
मात्र अखेर हे काम महसूल विभागाने पुर्ण करण्यासाठी कंबर कसली आहे. पाचोरा तालुक्यात मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल यांनी अद्याप पावेतो १० हजार शेतकऱ्यांचे ई केवायसी पुर्ण केले असून अद्याप २६ हजार शेतकऱ्यांचे ई केवायसी करण्याचे काम बाकी आहे. हे उद्दिष्ट पुढील दोन दिवसात साद्य करावयाचे असल्याने शेतकरी बांधवांनी जवळचे सेतु सुविधा केंद्र, ग्रामपंचायत कार्यालयातील ऑपरेटर, महाईसेवा केंद्रात जावून आपले ई केवायसी करुन घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे यांनी केले आहे.
अन्यथा पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले असेही उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी लोकशाहीशी बोलतांना सांगितले.