कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

0

जळगाव ;– विकसित भारत उद्दिष्टांच्या संदर्भात पुढील १० वर्षात विद्यापीठाला भारतातील पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये स्थान देण्याचे लक्ष्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने निश्चित करून पुढील वाटचाल करावी असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ गुरूवार दि.२९ फेब्रुवारीला झाला. या समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे अध्यक्षीय भाषण करतांना श्री. बैस बोलत होते. यावेळी असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीच्या सरचिटणीस डॉक्टर श्रीमती पंकज मित्तल यांचे दीक्षांत भाषण झाले. यावेळी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे तसेच व्य.प. सदस्य यांची उपस्थिती होती.

श्री. बैस यांनी या विद्यापीठाकडून अपेक्षा व्यक्त करतांना सांगितले की, राज्य सरकारच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने लहान गटातील विद्यापीठांना प्रोत्साहन दिले पाहिजे. या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उद्योजक आणि नवोन्मेषक बनण्यासाठी प्रोत्साहीत करावे, आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, गाव दत्तक प्रकल्पांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे आणि माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून विद्यापीठाच्या वाढ आणि विस्तारात सहभागी करून घ्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जगातील तिसरी आघाडीची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची प्रगती ही विद्यापीठे, शिक्षक, संशोधक आणि नवकल्पना, उद्योजकता यावर अवलंबून आहे. त्यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांनी स्टार्टअप सुरू करून नोकरी देणारे व्हा असे आवाहन त्यांनी केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

त्यामुळे चांगल्या परदेशी विद्यापीठांशी विद्यापीठाने भागिदारी करावी. कृत्रिम बुध्दीमत्ता आणि मशिन लर्निंगच्या युगात आपण जगत आहोत. त्यामुळे आरोग्य सेवा व शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे व्यापक परिवर्तन होणार आहे. त्यामुळे कृत्रिम बुध्दिमत्तेचा फायदा तोट्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे.

विद्यापीठाच्या वाटचालीविषयी कौतुक करतांना श्री. बैस म्हणाले की, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी विद्यापीठ सातत्याने प्रयत्न करीत आहे याचा आनंद आहे. नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात हे विद्यापीठ अग्रेसर आहे. विद्यापीठाचे माजी विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहे. ही अभिमानाची बाब आहे. श्री. बैस यांनी नंदुरबारच्या रावळापाणीचा उल्लेख करीत या भागतील आदिवासी क्रांतीविरांनी इंग्रजांचा निषेध केला होता.

ज्यात गोळीबार होवून अनेक आदिवासी बांधव शहीद झालेत. बहिणाबाई चौधरी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले आहे. त्यांना स्वत:ला शाळेत जाण्यासाठी संधी मिळाली नाही मात्र त्यांचे विचार, जीवनाचे तत्त्वज्ञान आणि त्यांच्या कवितांमुळे त्यांच्या लेखनावर अनेक पीएच.डी. झालेत. त्यावरून त्यांच्या विद्धतेची कल्पना येते असे ते म्हणाले.

दीक्षांत भाषण :

भारताला विश्वगुरू बनविण्याची क्षमता असलेले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणारे असून त्याच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व संस्था/ घटक यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतील असे प्रतिपादन डॉ. श्रीमती पंकज मित्तल यांनी दीक्षांत भाषणात केले.

डॉ. मित्तल यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे विविध पैलू उलगडून दाखविले. हे धोरण विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेवर भर देताना उच्च शिक्षणासह व्यावसायिक शिक्षणाच्या एकात्मतेवर लक्ष केंद्रित करणारे आणि कौशल्यावर आधारित शिक्षणाला योग्य प्रतिष्ठा व सन्मान देणारे आहे. हे धोरण प्राचीन भारतीय ज्ञान, शहाणपण आणि सत्याच्या तत्त्वज्ञान विचारांवर विकसित केले आहे. देशाच्या स्थानिक व जागतिक गरजा लक्षात घेऊन मसुदा तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्य आणि घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना विकसित करणारे आहे. असे सांगून डॉ. मित्तल म्हणाल्या की, इंटर्नशिप, उद्योगासमवेत संवाद अशा काही महत्वाच्या बाबी या धोरणात आहे. उच्च शिक्षणाच्या संस्था आता मुक्त आणि दुरस्थ शिक्षण तसेच ऑनलाईन शिक्षण कार्यक्रम आयोजित करू शकतील. विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यात भरपूर लवचिकता मिळेल. या धोरणातील शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट ही शिफारस क्रांतिकारक असल्याचे डॉ.मित्तल म्हणाल्या. इतर देशातून भारतात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे आणि भारतातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करणे हे धोरणाचे प्राथमिक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. या धोरणात प्राध्यापकांचे महत्त्व मान्य करण्यात आले आहे असे डॉ. मित्तल म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी सातत्याने विचार करण्याची सवय लावून घ्यावी यातूनच सर्जनशीलता आणि विचार करण्याची प्रक्रिया वाढीला लागते असा सल्ला त्यांनी स्नातकांना दिला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील योगशास्त्र विभाग, रूसा समावेशीत केंद्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी १०० विद्यार्थी सहायता दूत, प्रयोगशाळा ते जमीन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संशोधनासाठी दिले जाणारे प्रशिक्षण, डिजीटल अॅडजंट फॅकल्टी आणि कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे डॉ. मित्तल यांनी कौतुक केले.

कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करताना गेल्या वर्षभरातील नाविन्यपूर्ण उपक्रम, शैक्षणिक वाटचाल याबद्दल माहिती दिली. यावेळी काढण्यात आलेल्या दीक्षांत मिरवणुकीच्या अग्रभागी विद्यापीठाचा मानदंड घेऊन सहाय्यक कुलसचिव डॉ. देवेंद्र जगताप अग्रभागी होते. राष्ट्रगीत,राज्यगीत आणि विद्यापीठ गीत यावेळी सादर झाले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कुलपतींकडे कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. अधिष्ठाता प्राचार्य एस.आर. राजपूत यांनी विज्ञान व तंत्रज्ञान, प्रा. अनिल डोंगरे यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, डॉ.जगदीश पाटील यांनी मानव विज्ञान विद्याशाखा, आणि डॉ. साहेबराव भुकन यांनी आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करण्यास्तव केलेल्या विनंतीनुसार स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या. कुलपती श्री रमेश बैस यांनी स्नातकांना उपदेश केला.

मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे,प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्रा.सतीश कोल्हे, प्राचार्य संजय सुराणा, प्रा शिवाजी पाटील, प्रा सुरेखा पालवे, नंदकुमार बेंडाळे, ॲड.अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ.संजय ठाकरे, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

या समारंभात कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी पालकांसह मंचावर पदक घेण्यासाठी हजर होते. सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची नावे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील यांनी घोषित केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रफिक शेख व डॉ. विना महाजन यांनी केले.

या समारंभासाठी एकुण १९७१६ हजार विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ७९९१ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३३३८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ४०४२ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे १२३५ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३९०, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १२८८, प्रताप महाविद्यालयाचे ७१६, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७१२ विद्यार्थ्यांना देखील पदवी बहाल करण्यात आली. गुणवत्ता यादीतील ११८ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक देण्यात आले.यामध्ये ७७ विद्यार्थिनी व ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच एक सुवर्णपदक समान गुणांमुळे तीन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले. या समारंभात २०५ पीएच.डी. धारक विद्यार्थ्यांनी देखील पदवी घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.