अमळनेर : सध्या संपूर्ण राज्यात स्वस्त धान्य दुकानामधून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्याचे वाटप होत असून ग्राहकाला ई पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर धान्य वितरित करण्यात येते. परंतु, मागील चार ते पाच दिवसापासून तालुक्यात ई-पॉस मशीनचे सर्वर नसल्यामुळे आणि काही ठिकाणी सुरू असले तरी अत्यंत मंद गतीने चालत असून याचा फटका ग्राहकांना बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्वस्त धान्याचे वितरण खोळंबलेले असून दुकानांसमोर ग्राहकांच्या
रांगा लागलेल्या पहावयास मिळत आहे. स्वस्त धान्य दुकानाची बायोमेट्रिक पद्धतीने चालणारी प्रणाली एआसी सेंटरच्या माध्यमातून चालत असते, ही प्रणाली आता जुनी झाल्यामुळे ई-पॉस मशीनमध्ये •बर्झन टू असल्यामुळे नेटवर्क अत्यंत धिम्या गतिने मिळते. त्यामध्ये अनेक ग्रामीण भागात कधी कधी नेटवर्क सुध्दा मिळत नाही. त्यामुळे तासनतास मशीन बंद ठेवून नेटवर्क येण्याची वाट पाहावी लागते. ई-पॉस मशिनला वेगळे नेट डोंगल लावून सुद्धा नेटवर्क मिळत नाही, कारण सध्या मोबाईल रेंज मिळणे जास्त वापरामुळे अतिशय कठीण काम झालेले आहे. त्यामुळे धान्य वितरण कसे करायचे असा प्रश्न वितरकासमोर असून महिन्याच्या ३० तारखेपर्यंत डेटा असतो, असे नेटवर्क वारंवार जर गायब असले तर वाटप कसे करावे असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांना पडला आहे. या समस्येकडे महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.