लोकशाही न्यूज नेटवर्क
पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon session) पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. भाजपने आणलेल्या प्रस्तावावरून सत्ताधारी अडचणीत आले. हा प्रस्ताव विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भातील होता. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्या विरोधात भाजपने आणलेला अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी महाविकास आघाडी आग्रही होती. यासाठी महाविकास आघाडीने राज्यपालांनी भेट घेतली. त्यामुळे कमी सदस्य संख्या असतांना सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्यात महाविकास आघाडी पहिल्या दिवशी यशस्वी झाली आहे.
संपूर्ण प्रकार काय?
भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. नीलम गोऱ्हे या पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करत त्यांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी नीलम गोऱ्हे ठाकरे गटासोबत होत्या. परंतु आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात दाखल अविश्वास ठराव मागे घ्यावा असा प्रस्ताव दरेकर यांनी मांडला आहे.
महाविकास आघाडी आक्रमक
डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया विधान परिषदेतील हे तीन आमदार आता शिंदे गटासोबत आहे, परंतु या उपसभापती आहेत. त्यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे त्या संवैधानिक पदावर राहू शकत नाही. त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. त्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक झाले.