मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकल ट्रेनच्या धडकेत पश्चिम रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पालघर जिल्ह्यातील वसईजवळ घडली. रेल्वे कर्मचारी सिग्नलशी संबंधित समस्या सोडवत होते. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला असून याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी आज माहिती दिली.
सरकारी रेल्वे पोलीस (GRP) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री 8.55 वाजता वसई रोड आणि नायगाव स्थानकादरम्यान घडली. लोकत ट्रेन चर्चगेटच्या दिशेने जात होती. मुख्य सिग्नल निरीक्षक (भाईंदर) वासू मित्रा, इलेक्ट्रिकल सिग्नल मेंटेनर (वसई रोड) सोमनाथ उत्तम लांबुत्रे आणि मदतनीस सचिन वानखडे अशी या मृत रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं आहेत. हे सर्व कर्मचारी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सिग्नल विभागातील होते.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी सोमवारी (22 जानेवारी) संध्याकाळी काही सिग्नल पॉइंट्सच्या दुरुस्तीसाठी गेले होते. पश्चिम रेल्वेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत म्हणून ५५ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे.