जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव रेल्वे स्थानकावर अहमदाबाद-बैरानी एक्सप्रेसला आग लागल्याची माहिती मिळाल्याने प्रशासन यंत्रणाची तारांबळ उडाली. यावेळी महापालिकेचे तीन अग्निशमन बंब आणि रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे किरकोळ आग आटोक्यात आणली. दरम्यान घटनास्थळी महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी धाव घेवून माहिती घेतली.
अहमदाबाद-बैरानी (१९४८३) ही गाडी मुंबईकडून भुसावळकडे जात असतांना डाऊन एक्सप्रेसच्या एस ७ बोगीच्या चाकाजवळ आग लागल्याची माहिती सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अत्याधुनिक यंत्रणेमुळे मिळाली होती. त्यानुसार जळगाव रेल्वे प्रशासनाने तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन लावून माहिती दिली. यावेळी महापालिकेचे दोन आणि जैन इरिगेशनचा एक असे तीन बंब रेल्वे स्थानकाजवळ दाखल झाले. तर महापौर जयश्री महाजन आणि कुलभूषण पाटील यांना देखील माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील रेल्वे स्थानकात धाव घेतली.
रेल्वे प्रशासन व महापालिकेच्या प्रशासनच्या सतर्कतने यंत्रणा कामाला लागली. फायर ईन्स्टींग्यूशरच्या मदतीने किरकोळ आग विझविण्यात आली. सुदैवाने अत्याधुनिक यंत्रणेमुळे हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. जळगाव मनपाचे अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सहा. अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, फायरमन अश्वजित घरडे, तेजस जोशी, वाहन चालक वसंत न्हावी, भारत बारी, रवी बोरसे, नितीन बारी, वाहन चालक नारायण चांदेलकर, शिवा तायडे, पुंडलिक सपकाळे, वाहन चालक विक्रांत घोडेस्वार, सोपान कोल्हे, निलेश सुर्वे, नंदकिशोर खडके आदींनी सहकार्य करण्यासाठी धाव घेतली होती.