लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय किनारपट्टीवर पुन्हा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा टप्पा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात झाले आहे. आता हे मिचौंग चक्रीवादळ मंगळवारी ५ डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि मच्छलीपट्टणम किनारपट्टीवर धडकणार आहे. सोमवारी हे वादळ उत्तर तामिळनाडूमध्ये आले या वादळामुळे किनारपट्टीवर ११० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे, सध्या चक्रीवादळ पुडुचेरीपासून २५० किमी पूर्व-दक्षिणपूर्व, चेन्नईपासून २३० किमी पूर्व-दक्षिणपूर्व, नेल्लोरपासून ३५० किमी दक्षिणपूर्वमध्ये आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रवर होणार आहे.
118 ट्रेन रद्द, सार्वजनिक सुटी
चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन ११८ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहे. त्यामध्ये हावडा-चेन्नई एक्सप्रेस, शालिमार-चेन्नई कोटोमंडळ एक्सप्रेस, पुडुचेरी-हावडा एक्सप्रेस, एलेप्पी-धनबाद एक्सप्रेस, टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेस, कन्याकुमारी-डिब्रूगढ विवेक एक्सप्रेस, चेन्नई-पुरी एक्सप्रेस यांचा समावेश आहे. तामिळनाडूमधून ४,९६७ बचाव शिबीर तयार करण्यात आले आहे. राज्य सरकारने चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम, आणि चेंगलपट्टूमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पाऊस
‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे महाराष्टात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र. मराठवाडा, कोकण या भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु आहे. आता पुन्हा पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने यापूर्वी झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.