जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
मेहरूण तलावामध्ये पोहोण्यासाठी ४ मित्र गेले होते. खोल पाण्यात गेल्याने चारही मुले गटांगळ्या खाऊ लागले. हे पाहिल्यानंतर तेथील तरुणांनी उडी घेत तिघांना वाचविले. मात्र एका मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
जळगाव शहरातील शाहूनगर परिसरातील ईशान शेख वसीम (वय १३) असे बुडून मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान शाहूनगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (वय १३), अयान तस्लिम भिस्ती (वय १३) व अस्लम शेख सलाउद्दीन (वय १३) हे चारही जण मेहरूण तलाव परिसरात अंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यापर्यंत पोहोचले व गटांगळ्या खाऊ लागले.
तिघे वाचले पण..
सदरचा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. यातील काहींनी तलावात उडी घेत मोईन खान, अयान भिस्ती व अस्लम शेख हे तिघे हाती लागल्याने त्यांना बाहेर काढत वाचविले. त्यानंतर ईशान सापडला. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (Jalgaon Medical Collage) नेण्यात आले. तेथे ईशान याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मुलांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक मेहरुण तलाव परिसर व रुग्णालयात पोचले होते.