लोकशाही न्यूज नेटवर्क
वर्धात येथे आज सुरु झालेल्या 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला गालबोट लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलायला उभे राहिले, तेव्हा जोरदार गोंधळ झाला. महिलांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्याही भाषणावेळी घोषणाबाजी करत आंदोलन केले.
साहित्य संमेलन आणि वाद याचे नाते तसे जुनेच आहे. वर्धा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरूनही वादाचे सूर उमटले होते. मात्र, थेट संमेलनाच्या उदघाटनावेळी अचानक हा प्रकार घडल्याचे समोर आले. यामुळे संमेलनस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. शेवटी पोलिसांना सर्व मार्ग बंद करावे लागले.व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत सासणे, प्रसिद्धी हिंदी कवी डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे उदघाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाले. तेव्हा विदर्भवाद्यांनी पत्रके फेकून वेगळ्या विदर्भाच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना फरफटत बाहेर नेले.संमेलनाचा समारोप रविवार, 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, दत्ताजी मेघे, संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांची उपस्थिती राहणार आहे.