जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या सर्वत्र उन्हाचा चांगलाच कडाका वाढला आहे. राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा उच्चांकही वाढताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा ४२ अंशावर होता. जळगावसह राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावर प्रति चक्रवाताची स्थिती कायम असल्यामुळे मागील चार-पाच दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. त्यात आग्नेय दिशेने येत असलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्याची भर पडली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कमाल-किमान तापमानातील वाढीचा कल कायम राहण्याचा अंदाज आहे. जळगाव, नाशिक, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत पुढील दोन दिवस रात्रीच्या तापमानात वाढ होऊन रात्रीही उकाडा वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जळगावात तापमानाने सलग दुसऱ्या दिवशी ४२ शी ओलांडली आहे. यंदाच्या मार्च महिन्यातच जळगावात तापमानाने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता आणखी वाढणार असल्याने चिंता वाढली आहे.
अशी घ्या काळजी
दिवसभरात भरपूर पाणी प्यावे
कॅफीनयुक्त पेये अथवा मद्य टाळा
तीव्र उन्हात जाणे टाळा
सौम्य रंगाचे सुती कपडे वापरा
लहान मुले, ज्येष्ठांची काळजी घ्या
पंख्यासह वातानुकूलन यंत्रणेचा वापर करा
दुपारच्या वेळी बाहेरील सार्वजनिक कार्यक्रम टाळा