प्रवचन सारांश- 19/08/2022
श्रीकृष्णाच्या जन्मापासून तर त्यांच्या अंतिमक्षणापर्यंतचे जीवन सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरलेले आहे. त्यांच्या जीवनाचा बोध सर्वांनी घेतला तर नक्कीच फायदा होईल असा आत्मविश्वास पू. जयपुरंदर मुनी यांनी गोकुळ अष्टमीच्या विशेष प्रवचनात व्यक्त केला. जयगच्छाधीपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. अनुप्पेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात जळगावच्या स्वाध्याय भवनात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. त्यात दोन दिवसांपासून प्रासंगीक प्रवचन झाले.
श्रीकृष्ण यांचा जन्म मथुरेत कारागृहात झाला. पालनपोषण यशोदा आणि नंदराजाने केले. त्याचे शिक्षण उज्जयिनी येथे झाले. हस्तिनापूर आणि आजूबाजूचा परिसर हे त्यांचे कार्यक्षेत्र राहिले. श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण केले तर ते भक्तांच्या मनावर कुशल मार्गदर्शक, मानवता, नेता, गृहस्थ, योद्धा, सारथी, योगीराज आणि देवता या रूपात कोरलेले आहेत. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक प्रसंग मानवासाठी प्रेरणादायी ठरतो. ज्यांचा जन्माच्या आधीपासूनच प्रतिकूलता सुरू झाली अशा कंस आणि श्रीकृष्ण यांचा संघर्षाचे वर्णन प्रवचनात करण्यात आले. कारागृहात जन्मलेल्या कृष्णाचे पुण्य प्रबळ होते. पुण्य प्रबळ असेल तर आपल्याला मार्ग देखील आपोआप मिळत जातात. पुण्य प्रबळ असेल तर कुणी कितीही मारायचा प्रयत्न केला तरी त्यातून व्यक्ती सहीसलामत असते. कुणीही अशा पुण्यवान व्यक्तीचा केसही वाकडा करू शकत नाही.
आपल्या मृत्युचे कारण असलेल्या श्रीकृष्णाचा कंस जो नात्याने मामा असतो त्यांने घात करण्याचा प्रयत्न करतो परंतु कंसाचा मृत्यू श्रीकृष्णाच्या हातून होणे हे विधीविधान कुणीही टाळू शकले नाही. कृष्णाच्या जन्माआधी कारागृहात देवकी व वासुदेवाच्या बालकांना ज्या शिळेवर आपटून ठार केले त्याच शिळेत आपटून कंसाला श्रीकृष्णाने संपवीले. जेव्हा धर्माचा विनाश होतो तेव्हा भगवान जन्म घेतात. अर्जुनाला गीतेच्या रुपात दिलेला बोध आजही मोठा उपयोगी ठरतो.
आज योगायोगाने पू. जयधुरंधर मुनी यांचा 65 वा जन्मदिन आहे. सिव्हील इंजिनियर म्हणून चेन्नईमध्ये अत्यंत उत्तम कार्य करणारे गौतम मेहता जे जयधुरंधर मुनी झालेले आहेत. त्यांची दीक्षा घेण्याची इच्छा तर झाली. परंतु त्यांचा मोठा पुत्र संसारी नाव हेमंत यांना दीक्षा देण्याची परवानगी द्या व त्यानंतर तुमच्यासह परिवारातील 4 सदस्यांनी दीक्षा घ्यावी असे आचार्यश्री पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी 15 वर्षांपूर्वी दीक्षेबाबात सांगितले. गुरु आदेश मिळाल्यावर मेहता परिवाराने तसे केले. आपल्या संपत्तीमध्ये कुठलाही मोह न ठेवता करोडो रुपयांचे सत्पात्री दान केले. आपल्या पितृक गावी मुलींसाठी भव्य अशी शाळा बांधून ती शासनाला सुपूर्त केली.
———□■□■ ————
पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…