लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
दि. ९ जुलै रोजी झालेल्या जोरदार पावसाने लोहारा- एकुलती रस्त्यावर असलेल्या दुध्या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला. रस्त्याच्या दुतर्फा काढलेल्या नाली प्रवाहाचा विसर्ग व प्रवाहाचा वेग पाहता कमी पडल्याने नाल्याशेजारील शेताचा बांध फुटुन हाच प्रवाह उताराच्या दिशेने नाल्यापासून दोन नंबर असलेले शेतकरी बाबुराव आनंदा धनगर गट नंबर ३६७/१, क्षेत्र-३ हे. १० आर यांचे शेतातून गेला.
या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने ठिबक सिंचन वर उगवलेली कपाशी पिकाच्या मुळावरील भुसभुशीत माती वाहून गेली माती वाहून गेलेल्या क्षेत्रातील कपाशी यामुळे आडवी पडली. तर कार्यान्वित असलेल्या ठिबक नळ्या चोळामोळा होऊन गुंतागुंत झाली ठिबक नळ्यांवरही मातीचे आवरण बसले. भविष्यात सिंचन चालू करावे लागले तर हा गुंता कसा सोडवावा ? हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे.
वरच्या दिशेने आलेले सर्वच पाणी या शेतात शिरल्याने प्रवाहाने या शेताचाही मोठा बंधारा फुटुन बऱ्याच प्रमाणात या शेतातील माती नाल्यात वाहून गेली आहे. कोणत्याही वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर ही आफत माझ्यावर येते व माझी जमीन नापिक होण्याची भीती असून अशी भावना दैनिक लोकशाहीशी बोलताना शेतकऱ्याने व्यक्त केली.
तरी संबंधित ठेकेदार असो किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्याच्या असलेल्या दुतर्फा नालींची विल्हेवाट योग्य मार्गाने लावावी व मला नैसर्गिक आपत्ती म्हणून शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. शेतकऱ्यावरील आपत्ती व शासनाची मदत याकामी खुलासा घेण्यासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजपूत यांनी तलाठी यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल केला असता त्यांनी उचलला नाही.