फसवणूक करणाऱ्या कृषि केंद्र चालकांचा परवाना रद्द करणार – कृषि सहसंचालक

0

चोपडा तालुक्यातील तीन केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द, ; चार जणांचे परवाने निलंबित

जळगाव ;- खत व बियाणे विक्रीतून मोठया प्रमाणात शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. विक्रेत्यांकडून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागत असते. कृषि विभागाने फसवणुकीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष केंद्रीत केले असून शेतकरी बांधवांची फसवणूक करणाऱ्या केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहे. असा इशारा मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिला आहे.

शेतकरी बांधवांची फसवणूक होवू नये याकरीता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून कृषि विक्री केंद्रांची तपासणी सुरु आहे. तपसणीत त्रुटी आढळून आल्याने मे. रिध्दी सिध्दी कृषि केंद्र, चोपडा, मे. ओम साई फर्टिलायझर, अडावद, ता. चोपडा व मे. रामेश्वर विकास कार्यकारी सहकारी सोसा.लि. कठोरा, ता. चोपडा यांचे खत विक्री परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. तसेच युरीया खत विक्रीत अनियमितता आढळुन आल्यामुळे माहे एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत ४ खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहे. या ४ विक्रेत्यांची परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगांव यांनी सुनावणी घेऊन खत विक्रेत्यांच्या परवान्यावर कडक कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे. जिल्ह्यात विनापरवाना निविष्ठांची विक्री कोणी करत असेल तर कृषि विभागाच्या मोबाईल क्र. ०८९८३८३९४६८ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५ वर माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यात बनावट बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके यांची विक्री तथा जादा दराने कृषि निविष्ठांची विक्री करीत असल्यास वा कोणत्याही विक्रेत्याने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास अशावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असेही श्री. वाघ यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.