लोकशाही विशेष लेख
उन्हाळा आला की आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. उन्हाळ्यात तापमान वाढ झाल्याने शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी होते. तरी उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायलं तरीही तृष्णा मिटत नाही. म्हणून उन्हाळ्यात रसदार फळांचं सेवन करायला हवे. उन्हाळा आला की आंबे आणि कैरी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. ‘कैरी’ (Kairi) नाव जरी काढलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. या कैरीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. चला तर मग जाणून घेवूया कैरी खाण्याचे फायदे.
उन्हाळ्याच्या दिवसात छान गूळ टाकून थंड कैरीचे पन्हे (Kairi panhe), कैरीचे आंबट गोड लोणचे, कैरीचा मोरावळा, कैरीची भाजी, कैरीची चटणी असे अनेक तऱ्हतऱ्हेचे पदार्थ आणि पेय आपल्या घरात बनवले जातात. कैरीत पौष्टिक घटक असल्याने रक्तदाब सुरळीत होतो, पचनक्रिया सुधारते, शारीरिक थंडावा मिळतो, केस, त्वचेचे आरोग्य सुधारते. मात्र कैरी खाणे जितके गुणकारी आणि तितके अपायकरिही आहे म्हणून कैरी खाताना काळजी घेणंही आवश्यक आहे.
उन्हाळ्यात कच्ची कैरी खाल्याने शरीरातील फ्लुईडचे (fluid) प्रमाण नियंत्रणात राहते. म्हणून उन्हाळ्यात उष्माघाताचा त्रास जाणवत असल्यास कैरीचे पन्हे प्यायला पाहिजे. कैरीच्या सेवनाने शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते. कैरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण मुबलक असल्याने शरीरात इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण राखण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते आणि हृद्यविकारांचा धोकाही कमी करता येतो. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.
कैरीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा किंवा मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून डाळीमध्ये, आमटीमध्ये कैरीचा समावेश करावा.अॅसिडीटी, हार्टबर्न, मळमळ हे त्रास होत नाहीत. कैरीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट व व्हिटॅमिन सी त्वचा आणि केस हेल्थी बनवण्यात मदत करतात. अॅस्ट्रींजंट गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. तसेच पिंपल्स, ऑईली स्किन अशा समस्या दूर होतात. तोंडाला दुर्गंधी येणे, हिरड्यांमधून रक्त येणं, दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. तसेच मजबूत आणि स्वच्छ दातांसाठी कैरीचं सेवन केलं पाहिजे.
कविता ठाकरे / चौधरी