रेल्वे रूळावरील आत्महत्या रोखण्यासाठी १८ किमी संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मध्य रेल्वे भुसावळ विभागाकडून जळगावात पथनाट्याद्वारे सोमवारी एक जनजागृती अभियान राबविण्यात आले. रेल्वे स्टेशन परिसर तसेच मध्य व वेस्टर्न लाइनवर रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे तसेच धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलाडणाऱ्यांचे प्रमाण जास्त वाढल्याने नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले. यावेळी डीआरएम ईती पांडे यांनी रेल्वे लाइनची पाहणी करून १८ किलोमीटरची संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

मध्य रेल्वे भुसावळ विभागातर्फे जळगाव शहरात सोमवारी सकाळी जिल्हा परिषदसमोरील उड्डाणपुलाखाली तसेच सुरत गेट येथे रेल्वे पोलिस पथनाट्य पथकाद्वारे रेल्वे खाली आत्महत्या व रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांबाबत तसेच स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या डीआरएम ईती पांडे, सुमन कुमार, एच. श्रीनिवास, निशिध मल, जयप्रकाश मौर्य, डी. पी. सिंग, डी. एच. पाटील, जळगाव स्टेशन प्रबंधक एस. एम. अग्रवाल उपस्थित होते.

रेल्वे ट्रॅकवर केली पाहणी..

तहसील कार्यालयाकडून तसेच शिवाजीनगरच्या नवीन बांधलेल्या पुलाखालून अनेक जण रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळे होणाऱ्या अपघात व रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रमाण येथे वाढले आहे. या जागेची पाहणी डीआरएम पांडे यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना संरक्षक भिंत लवकरात लवकर बांधून हा रस्ता बंद करण्याच्या सूचना दिल्या.

 

रेल्वेखाली आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. हे थांबविण्यासाठी रेल्वे पोलिस व कर्मचारी जनजागृती करीत आहेत. तसेच रेल्वे लाइनलगत १८ किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.

– ईती पांडे, डीआरएम रेल्वे विभाग भुसावळ.

Leave A Reply

Your email address will not be published.