जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील रस्त्याच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यलयातर्फे मक्तेदारांना वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल वाळू वापरण्याची सध्या तरी गरज नसल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहरातील रस्त्याची कामे महापालिका फंडातून करण्यात येणार आहे. महापलिकेडून रस्त्याच्या निवीदा काढून मक्तेदारांना रस्त्यांच्या कामाचे आदेश देखील देण्यात आले आहे. यात बहुतांश कामे सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची आहेत. त्या कामांसाठी वाळूची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अगोदर करण्यात आली होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू देण्यास नकार देत आर्टीफिशीयल वाळू वापरण्यास सांगितले होते.
त्यामुळे महापालिकेने रस्ते कामासाठी आर्टीफिशीयल वाळू वापरण्याबाबत आदेश काढण्याचा निर्णय घेतला होता. त्याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्रस्तावही तयार केला होता. प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या स्वाक्षरीनंतर आदेश लागू करण्यात येणार होते. दरम्यान, नदीची वाळू उपलब्ध करण्याबाबत मक्तेदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. त्यातच आता काही चोरटी वाळू जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने या वाळूचे लिलाव करून ते देण्याची तयारी दाखविली आहे.