ज्ञानसंपन्न भारत घडवण्याची क्षमता असणारा शैक्षणिक जाहीरनामा; डॉ. चंद्रकांत साळुंखे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

“नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० – शिक्षकांची भूमिका व आव्हाने” या विषयावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात इंग्रजी व मराठी माध्यमातील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे विश्वस्त व प्रतिनिधी यांच्यासाठी विशेष मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली. ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींना माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, डायटचे अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यशाळेचे आयोजन जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा व रायसोनी महाविद्यालयाचे अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी केले. यावेळी व्यासपीठावर रायसोनी कनिष्ठ महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यानंतर सदर मार्गदर्शन कार्यक्रमात रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल म्हणाल्या की, देशाला ‘जागतिक ज्ञान महासत्ता’ बनविणे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. प्रत्येक मुलाला वयाच्या चौथ्या वर्षापासून मूल्याबरोबरच कौशल्याधारित व संशोधनाचे धडे दिले जातील. प्रत्येक विद्यार्थ्याचा कल पाहून त्या विषयातील कौशल्य व संशोधन आधारित शिक्षण मिळेल. विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीबरोबरच त्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक प्रगतीचा देखील विचार नव्या धोरणात करण्यात आला आहे. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज देशातील प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, त्यामुळे शिक्षणाच्या संदर्भात व्यापक संख्येचा विचार करावा लागणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण व्यवस्थेत आता ५+३+३+४ या सूत्रानुसार ३ ते ८ वर्षे, ८ ते ११ वर्षे, ११ ते १४ वर्षे आणि १४ ते १८ वर्षे असे चार टप्पे तयार करण्यात येणार आहेत. एका वर्गातील शिक्षक आणि विद्यार्थी याचे प्रमाणदेखील नव्या धोरणात निश्चित करण्यात आले आहे. तसेच या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मुख्यत्वे एक्सेस, इक्वलिटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी, अकाउंटॅबिलिटी या पाच स्तंभांवर आधारित आहे असे मत त्यांनी यावेळी मांडले.

यानंतर जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी इनोवेटिव टीचिंग मेथोडोलॉजी वर मार्गदर्शन केले व विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करत आजच्या विध्यार्थ्यांना कशा प्रकारे उत्तम शिक्षण देता येईल यासंदर्भात देखील आपले मत मांडले तसेच त्यांनी यावेळी जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमधील इनोव्हेशन लॅबमधील तंत्र व केसस्टडीबाबत संवाद साधत उपस्थित मुख्याध्यापक व इतर प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षक प्रतिनिधींनीही आपली मते मांडली. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणातील विविध बदलांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यानंतर महाविद्यालयाचे अॅडमिनिस्ट्रेशन डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी आपल्या आभार प्रदर्शनात संस्थेच्या कार्याचा आढावा घेत शिक्षणविषयक व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन प्रा. राहुल त्रिवेदी यांनी केले. यावेळी शहरातील विविध संस्थेच्या महाविद्यालयांचे आजी-माजी प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आदी शिक्षकवर्ग व प्रशासकीय कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितमजी रायसोनी यांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.