लोकशाही न्यूज नेटवर्क
आपल्या घरातील स्त्री बाहेर गेली आणि घरी परत यायला तिला उशिर झाला की जीव कासाविस होतो. रात्री अपरात्री काही झालं तर? मात्र ती घरात सुखरूप आल्या नंतर आपली काळजी संपते. घरातल्या चार भिंतींच्या मर्यादेत ती सुरक्षित असते. पण अशाच असुरक्षित व धोक्याच्या कित्येक स्त्रिया रात्री भटकत असतात;ती कुणाची तरी आई, मुलगी,अथवा पत्नी, किंवा बहीण असेल. पण त्यांची वाट पाहणारं असं कुणीच नाही. अशा अनेक महिला ज्यांना त्यांच्या आपल्या लोकांनीच व समाजाने देखील सोडून दिलं आहे. कारण त्या आजारी आहेत मनोविकृत आहेत,त्यांचे वय, म्हातारपण आले आहे. आंबेवडगाव तालुका पाचोरा येथे दिनाक १२/०६/२०२३ रोजी एक ७० वर्षीय महिला आजी भर उन्हामधे दुपारी अंगणात बेशुद्ध अवस्थेत पडून होती. तिचे नाव चिंदाबाई वना मराठे असे गावकऱ्यांनी सागितले. परंतु त्या आजीचे नातेवाईक किंवा सुना किंवा नातू कोणीही त्या आजीच्या मदतीला आले नाहीत. आजीची तब्येत खालवलेली पाहून गावातील काही सुज्ञ महिला व नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांना विचारपूस केले असता त्यांच्याकडून मदतीची कोणतीही आशा वाटत नव्हती शेवटी माणुसकी ग्रुपचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर यांना कॉल करून सदर घटना सांगून त्वरित आंबेवडगाव येथे येण्याची विनंती केली.
समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी क्षणाचा ही विलंब न करता तात्काळ आंबेवडगाव गाठले. व त्या ठिकाणी आजीची अवस्था पाहून कोणी नातेवाईक आहे का याची विचारपूस केली. गावात नातेवाईक राहत असून ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, आजीच्या नातूचा नंबर मिळून आला परंतु त्याला कॉल केला असता त्यांनीही सांगितले की आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही आजीला कोणत्या प्रकारचे उपचार देऊ शकत नाही. आजीची तब्येत फार खालावली असल्यामुळे , गजानन क्षीरसागर यांनी गावातील महिलाना बोलून आजीची अंघोळ केली. त्यानंतर प्राथमिक माहिती पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे व पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार यांना कॉल करून सदरील घटनेची माहिती यांनी दिली. व पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्स द्वारे जळगावला स्वतः त्या पेशंट सोबत जाऊन दाखल केले.