क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
मागच्या महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघ उद्यापासून पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये नव्या चॅम्पियनशिप साखळीला आपली सुरुवात करत आहे. बुधवारपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामने खेळणार आहे. मालिकेचा पहिला कसोटी सामना डोमिनिकाच्या विंडसर पार्कमध्ये खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या तिसऱ्या हंगामाची सुरुवात कऱणार आहेत.
दरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. लागोपाठ दोन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. भारतीय संघात युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलेय. यशस्वी जायसवाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यासारख्या खेळाडूंना स्थान दिलेय तर अनुभवी चेतेश्वर पुजाराला डावलण्यात आलेय. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामने संध्याकाळी सुरु होणार आहेत.
हे सामने भारतीय वेळेनुसार, कसोटी सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होणार आहेत. तर एकदिवसीय सामने सात वाजता सुरुवात होणार आहेत. टी20 सामन्याला रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी, वनडे आणि टी20 सामने डीडी स्पोर्ट्सवर पाहता येतील.. फॅनकोड आणि जिओ सिनेमा या अॅपवरुन तुम्ही सामन्याचे थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकणार आहात.