लोकशाही न्यूज नेटवर्क
अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करत, दोन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ही कारवाई दुपारी केल्यानंतर रात्रीच्या सुमारास पुन्हा एक गाडी आढळून आल्याने, अज्ञातांनी जनावरांची वाहतूक करणाऱ्या या गाडीला पेटवून दिले आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यात रात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांच्या जमावाने अवैधरित्या जनावरांची गाडी पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान 27 जानेवारीला दुपारच्या सुमारास गोवंशाची गाडी घेऊन जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई झाली असतानाच रात्रीच्या सुमारास पुन्हा अवैधरित्या गाडीतून जनावरे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर न्याहरखेडे शिवारात वळण बंधाऱ्याजवळ काही तरुणांच्या जमावाने पाठलाग करत गाडीतील गोवंश खाली उतरवत गाडीला आग लावली.
गाडी संपूर्णपणे जळून खाक
यात संपूर्ण गाडी जळून खाक झाली. याची माहिती येवला तालुका पोलिसांना मिळताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यापूर्वी संपूर्ण गाडी जळून खाक झाली होती. जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, गाडी पेटविणाऱ्या तरुणांचा पोलीस शोध घेत आहे.