एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यातील हनुमंत खेडे बु || हे अंजनी नदीच्या किनाऱ्यावर आहे. त्यामुळे सोनबर्डी गावाला जोडणारा एक साधा पूल उभारण्यात आला आहे. अंजनी नदी पात्रात पाईप टाकून वर खडी, दगड, रेती टाकण्यात आली आहे. सदर रेती पाण्यात वाहून गेली होती. या पुलावरून हनुमंत खेडे बुद्रुक येथील राजेंद्र भगवान पाटील (६२) हे इसम अंजनी नदी पार करत असताना पाय घसरल्याने ते पाण्यात वाहून गेले. ही घटना रविवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचे वृत्त समजताच तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी समक्ष जाऊन भेट घेतली व घटनेची माहिती घेतली. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास सदर व्यक्तीचा मृतदेह गावालगत नदीच्या किनाऱ्याला आढळून आला.
राजेंद्र पाटील सोनबर्डी शिवारात बांधकामावर मजूर म्हणून कामाला गेले होते. संध्याकाळी जुन्या पुलावरून घरी परततानां त्याचा पाय घसरल्याने ते नदीच्या पाण्यात पडले व पाण्यात वाहून गेले. रात्री उशिरापर्यंत त्यांना शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, मात्र यश मिळाले नाही. सोमवारी सकाळी अंजनी नदीच्या किनाऱ्याला त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.