जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास यामुळे विजयाचा विश्‍वास – गुलाबराव पाटील यांचे भावोद्गार

0

 

पाळधी, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

आपल्या आजवरच्या कारकिर्दीत मी नेहमीच जनतेच्या हिताचा विचार केला. त्यांच्यासाठी झटलो, याचमुळे आज याच जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. लहानातील लहान कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खात आपण धावून जातो यामुळे त्यांची देखील मला भक्कम साथ लाभली आहे. तर,कोणताही भेद न बाळगता केलेला चौफेर विकास यामुळे जनता देखील सोबत आहेच. याचमुळे विरोधकांनी कितीही आटापीटा केला तरी आपल्याला आगामी निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद लाभणारच ! अशा आशावाद पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथील ग्रामपंचायत जवळच्या मैदानावर नेहमीप्रमाणे जंगी सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत गुलाबराव पाटील यांनी त्यांचा चितपरिचीत आक्रमक शैलीत विरोधकांचा जोरदार समाचार घेतांना आजवरच्या वाटचालीत सर्वसामान्यांनी दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मान्यवर नेते आणि पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जबरदस्त स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या आभाराला उत्तर देतांना पालकमंत्री भारावल्याचे दिसून आले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून विविध जनहितार्थ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाला सकाळपासून ते रात्री पर्यंत पालकमंत्र्यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. तसेच याप्रसंगी विविध कार्यक्रम घेण्यात आले. तर रात्री ८.०० वाजता पाळधी येथील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या मैदानावर पाटील यांचा अभिष्टचिंतनपर सभेचे आयोजन करण्यात आले. पालकमंत्र्यांचे ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची प्रचंड आतषबाजी आणि जोरदार घोषणांनी स्वागत करण्यात आले. प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

गुलाबराव पाटील यांनी या सत्कार सोहळ्यात आपल्या जबरदस्त शैलीत भाषण केले. ते म्हणाले की, आजच्या सभेला उसळलेला हा जनसागर पाहून माझे मन भरून आले आहे. असे वाटते की आज निवडणूक झाली तर आजच आपण जिंकलेलो आहोत. आजच्या सभेत तरूणाईचा सहभाग पाहून मला देखील युवासेनेचा जिल्हाप्रमुख झाल्यासारखे वाटत आहे. तरूणांचा कल हा राजकारणात खूप महत्वाचा मानला जातो. आणि आजचे चित्र हे तरूण आपल्याकडे असणारे आहे. हे रॉ मटेरियल आपल्यासोबत असल्याने आपण निर्धास्त आहोत. आम्ही हिंदुत्वासाठी उठाव केला. आमचे उध्दव ठाकरे यांच्याशी वैयक्तीक शत्रूत्व नाही. मात्र हिंदुत्वासाठी आपण उठावाचा निर्णय घेतला. मात्र आता विरोधक यावरून करत असलेल्या टिकेला आपण जराही घाबरत नाही. आता धरणगावचे एक भूत माझ्यावर टिका करतेय, त्यांना माझे चॅलेंज आहे की, ही जागा शिवसेनेची होती. यामुळे त्यांनी हिंमत असेल तर उबाठातून मैदानात उतरावे. तर जे धरणगावचे नगराध्यक्ष होते तेच पाण्यासाठी मोर्चा काढत असल्याचा विरोधाभास हा जनतेच्या लक्षात आल्याची टिका देखील त्यांनी केली. आतापर्यंत न दिसणारे लोक आता मतदारसंघात दिसू लागले आहेत. मात्र मी त्यांच्यासारखा सीझनेबल पुढारी नसल्याची टिका त्यांनी केली. तर विरोधकांकडे वाटण्यासाठी रग्गड पैसे असतील तर ते पैसे हिसकावण्याची धमक आमच्यात असल्याचे देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, आजवरच्या राजकीय वाटचालीत आपण केवळ आणि केवळ जनतेच्या हिताचा विचार केला. पाळधीकरांच्या ऋणातून उतराइ र्होण्यासाठी येथे पाणी पुरवठा योजनेचा काम पूर्ण झाले असून पुढील महिन्यापासून पाळधीकरांना दररोज पाणी मिळणार असल्याची घोषणा देखील गुलाबराव पाटील यांनी केली. तर पाणी पुरवठा खात्यातीत केलेल्या कामांमुळे मला पाणीवाले बाब म्हणून उपाधी मिळाली असून आज जणू काही पाळधीत पाणीवाल्या बाबांची जत्रा भरल्याचे दिसून येत असल्याचे प्रतिपादन देखील गुलाबराव पाटील यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर ह.भ.प. रवीकिरण महाराज, बुलढाणा आ.संजय रायमूलकर, आ.किशोर पाटील, आ.चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील, महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिता माळी-कोल्हे, तालुका प्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, उपजिल्हाप्रमुख पी.एम .पाटील, नाना सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, आबा माळी, रविंद्र चव्हाण, सचिन पवार, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी पी.सी.पाटील, सुभाष पाटील, संजय महाजन, शिरीष बयास, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील,  जि.प. सदस्य पवन सोनवणे, गोपाल चौधरी, प्रतापराव पाटील, रमेश पाटील, पंचायत समितीचे सभापती, जना कोळी, प्रेमराज पाटील, पप्पू भावे, विलास महाजन, भगवान महाजन, दोन्ही पाळधीचे सरपंच प्रकाश पाटील, शरद कोळी, शोभा चौधरी, ज्योति शिवदे, मुकुंद सपकाळे, पंचायत समिती सदस्य,  शिवसेना,  युवासेनेचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले. आभार जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रतापराव पाटील व त्यांच्या टीमने केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.