शिरसोली येथील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल …

0

जळगाव ;- तरुणाने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. १० मार्च रोजी पहाटे तालुक्यातील शिरसोली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रमेश उर्फ रवींद्र निंबा पाटील (वय ३२, रा. अशोक नगर, शिरसोली प्र.न. ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.  गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. दोन दिवसांपासून तो कुठ्ल्यातरी तणावात असल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली.

याच नैराश्यातून त्याने रविवारी मध्यरात्री घरातील स्वयंपाक घरात दरवाजा बंद करून झोक्याच्या दोरीला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शितल झोपेतून उठली तेव्हा पती दिसून आले नाही. त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाक घराचा दरवाजा आतमधून बंद होता. त्यांनी शेजारच्या नागरिकांना बोलावून दरवाजा तोडला. तेव्हा तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोहेकॉ रामकृष्ण पाटील करीत आहेत. मयत तरुणाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, मोठा भाऊ असा परिवार आहे.
,

 

Leave A Reply

Your email address will not be published.