जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
५५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता जळगाव तालुक्यातील धानवड येथून उघडकीस आली. शिवाजी चिंधा पाटील (वय ५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील हे पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला होते. मंगळवार १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.
“कर्जबाजारीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे” असे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा अंदाज नातेवाईकांनी दिला आहे. दरम्यान सदर प्रकार त्यांचा मुलगा आणि पत्नीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रचंड आक्रोश केला.
नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.