बेळगाव ;- जिल्ह्यातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरुणगौडा पाटील यांनी आपल्या कारकीर्दीत सन 1967 च्या गळीत ऊसाला प्रति टनास 211 रुपये प्रमाणे विक्रमी दर दिला होता. त्यावेळी सोन्याचा भाव प्रति तोळ्यास 160 रुपये होता. त्या दराच्या प्रमाणभूत बाजार भाव नुसार उसाला ६० हजार रुपये दर मिळणे आवश्यक आहे. तरीसुद्धा ऊसाला प्रति टनास किमान पाच ते सहा हजार रुपये दराची अपेक्षा -मागणी करणे चुकीचे नाही अशी माहिती कर्नाटक राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे माजी अध्यक्ष व सहकारी नेते डी. टी. पाटील यांनी दिली.
केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ऊस ,साखरेसह सर्व कृषी उत्पन्न मालांना पाहिजे तसा दर मिळत नाही. उत्पादन खर्चावर आधारित कृषी मालाला दीडपट दर देण्याची ग्वाही फसवी ठरली आहे. ‘सबका साथ सबका विकास ‘ही घोषणा प्रत्यक्ष साकारण्यासाठी शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्ताधारी पक्षासह सर्वपक्षीय नेत्यांनी चिंतन करण्यासह एकमताने धोरण राबविले पाहिजे. सरकारचे सदोष धोरण हेच शेतकऱ्यांसाठी मरण ठरताना दिसून येत आहे . सरकारच्या एकतर्फी व मनमानी धोरणात केवळ खाणाऱ्यांचेच हित व चिंता जोपासले आहे . पिकविणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांचा मात्र बळी दिला जात आहे . कृषीप्रधान देशात सर्व बाजूंनी होणारे शेती व शेतकऱ्यांचे शोषण लाजिरवाणे आहे अशी स्पष्टोक्ती डी टी पाटील यांनी केली.