मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मध्य प्रदेशच्या नर्मदा नदीत कोसळून पडलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस दुर्घटनेत १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही माहिती कळताच राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून अद्याप बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या बचाव कार्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. तसेच भाजपाचे वरिष्ठ नेते गिरिश महाजन यांना प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेण्यास मध्य प्रदेशात पाठवण्यात आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे बचावकार्यावर लक्ष आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातील धार येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला. आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. ही अतिशय दुखद घटना आहे. अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मदतीचे निर्देश दिलेले आहे. जखमींना वाचविण्यासाठी त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. आपले देखील काहीजण तेथे पोहोचले आहेत. गिरीश महाजन यांना तातडीने इंदूरला पाठवण्यात आले आहे. या बचाव मोहिमेसाठी मदत करावी, असे त्यांना सांगितले आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यात बचावकार्यासाठी एक समन्वय केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रातून नातेवाईकांना सर्व माहिती दिली जात आहे. धार येथील जिल्हाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तेथील परिस्थिती मला दाखवली आहे. सर्व प्रकार अतिशय गंभीर आहे. निश्चितपणे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सामील आहोत. जे बेपत्ता झाले आहेत, त्यांना शोधण्याचे काम सुरु आहे असे देखील फडणवीस यांनी सांगितले.