जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील शिरसोली येथे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाल्याने 19 वर्षीय युवक दगावल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी घडली. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर कामाला लागले आहे. शुक्रवारी दिवसभर शिरसोली येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्त नमुने, तापाची तपासणी सुरू करण्यात आली होती.
दिवसभर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे पथक तसेच जिल्हा हिवताप कार्यालयाचे पथक शिरसोली येथे ठाण मांडून होते. शिरसोली शुक्रवारी दिवसभरात वैद्यकीय पथकाने 1297 घरे तपासली त्यापैकी 66 घरांमध्ये डास अळी आढळून आली असून 2219 कंटेनर तपासण्यात आले आहेत. तर डास अळी 95 कंटेनर मध्ये आढळून डास अळी आढळून आली आहे. 6 रुग्णांना तापाची लागण आढळून आली आहे. तर अति तीव्र ताप असलेल्या 5 रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.
शिरसोली येथे डेंग्यू सदृश्य आजाराची लागण झाल्याने 19 वर्षे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येताच जिल्हा परिषदेचे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक दिवसभर शिरसोली येथे ठाण मांडून होते. प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावात रक्त नमुने गोळा करण्याचे काम सुरू होते. त्यासोबतच जनजागृती करणे तसेच डेंग्यूपासून सावध राहण्यासाठी करावयाच्या उपायोजनांच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या जात होत्या. याबरोबरच डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेला कोरडा दिवस पाडण्याचे आवाहन देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे शिरसोली येथील ग्रामस्थांना करण्यात आले.
शिरसोली येथे एक प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक, स्वयंसेविकांच्या मदतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासोबत जिल्हा हिवताप कार्यालयाचे एक पथक देखील शिरसोली येथे ठाण मांडून असून कीटक शास्त्रीय संशोधन त्यांच्याद्वारे सुरू करण्यात आले आहे. साथ रोग पथक देखील शिरसोली येथे ठाण मांडून असून ताप सदृश्य रुग्ण शोधण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. प्रशासन संपूर्णपणे अलर्ट मोडवर असून डेंग्यू सदृश्य आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनातर्फे सर्व प्रकारची उपाययोजना केली जात असल्याने ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केले आहे.