मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने थैमान घेतले होते . त्यातच आता बंगालच्या उपसागरावर आणखी एक चक्रीवादळाचं संकट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आज रविवारी हे कमी दाबाचं क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र, काही भागात हवामान कोरडं राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर भागात हवामानात गारठा जाणवणार आहे. कोकण किनारपट्टी भागात हवामान कोरडं पाहायला मिळणार आहे.
पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील 24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.