तिरुवनंतपुरम, लोकशाही न्यूज नेटवर्क:
केरळमध्ये दोन महिलांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या हत्याकांडात नरबळी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी जोडप्याने त्या महिलांचेही मांस खाल्ले असावे, असा संशय कोची पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. तीन आरोपी, मसाज थेरपिस्ट भगवंत सिंग, त्यांची पत्नी लाली आणि त्यांचा एजंट मोहम्मद शफी यांना काल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी जोडप्याने तंत्र-मंत्राच्या माध्यमातून पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी मानवी बळी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचा एजंट शफीने दोन महिलांना आमिष दाखवून आरोपीच्या घरी आणले आणि तिथेच त्यांचा बळी देऊन दफन करण्यात आले. या घटनेनंतर पोलीस गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झालेल्या लोकांचाही तपास करत आहेत.
कोचीचे पोलीस आयुक्त नागराजू चकिलाग म्हणाले, “आमच्याकडे यावर विश्वास ठेवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. फॉरेन्सिक तपासणी आणि पुरावे गोळा करण्याचे काम आजही सुरूच आहे.” आरोपी वेडे आणि मनोरुग्ण असल्याचे सांगून ते म्हणाले की, गुन्ह्याचा मूळ हेतू लैंगिक सुख हाच असल्याचे दिसून येत आहे. रोसेलिन आणि पद्मा यांना बांधून क्रूरपणे मारण्यात आले. त्यांच्या मृतदेहाचे छोटे तुकडे करून त्याचा काही भाग पुरण्यात आला होता. आर्थिक संकट संपवण्यासाठी हा मानवी बळी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. रोझलिन जूनमध्ये आणि पद्मा सप्टेंबरमध्ये बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रोसेलिन आणि पद्मा यांना बांधून क्रूरपणे मारण्यात आले.
पोलीस सूत्रांनी सांगितले की, मसाज थेरपिस्ट भगवंत सिंग आणि त्यांच्या पत्नीने चौकशीदरम्यान उघड केले आहे की त्यांनी पीडितांचे मांसही खाल्ले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन केले आहे. या दाम्पत्याला आणि त्यांच्या एजंटला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्येची माहिती मिळताच पोलीस पद्मा बेपत्ता झाल्याचा तपास करत होते. महिलांचे फोन एजंट मोहम्मद शफीकडे सापडले, त्याने चौकशीदरम्यान अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिस आयुक्तांनी सांगितले की, बेपत्ता झालेल्या महिलांबाबत आमच्या तपासात असे आढळून आले की तिरुवल्ला येथील दाम्पत्याच्या घरी त्यांची हत्या करण्यात आली होती आणि मृतदेहाचे तुकडे करून पुरण्यात आले होते. आर्थिक फायद्यासाठी मानवी बळी दिल्याचे प्रकरण होते. आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली.