कापूस व्यापाऱ्याला शस्त्रांचा धाक दाखवून लुटणारे जेरबंद

0

जळगाव ;- कापूस व्यापाऱ्याला शस्त्रांचा धाक दाखवून दहिवद येथे दि. १२ मे रोजी अज्ञात दरोडेखोरांनी १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलिसांनी कोणताही सुगावा नसतांना मध्यप्रदेशातील एका छोट्या खेड्यातून मुद्देमालासह अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी २७ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

चाळीसगाव तालुक्यातील दहिवद गावात दि. १२ मे रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजेच्या दरम्यान कापूस व्यापारी धर्मराज पाटील यांच्या घरात सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लोखंडी व लाकडी रॉडने पाटील परिवाराला मारहाण केली होती. तसेच घरातील दागिने, मोबाईल असा १६ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

दरोडेखोरांनी तोंड बांधलेले असल्याने त्यांना कोणीही पाहिलेले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी “क्राईम स्टडी” वर भर देत केवळ १३ दिवसात तपास लावला. चाळीसगाव तालुक्यात कामाला पावरा समाज अधिक आहे. त्यावरून धागा मिळाल्यावरून मध्यप्रदेशातील भामपूर येथील अतिदुर्गम भागात पोलिसांनी जाऊन तिघांना ताब्यात घेतले. यात कालूसिंग हुजारिया बारेला (वय ५२, रा. भामपूर ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश), सुनील मुरीलाल बारेला (वय २१, रा. बुलवानीया ता. सेंधवा जि. बडवाणी, मध्यप्रदेश) व एक अल्पवयीन मुलगा यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडे दागिने, बोलेरो कार, दुचाकी, दरोड्याचे साहित्य असे मिळून आले आहे. त्यांच्याजवळ जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून चोरलेली दुचाकीदेखील मिळून आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, एलसीबीचे वरिष्ठ पो. नि. किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी, मेहुणबारे पोलीस स्टेशनने केली आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.