अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
अमळनेर तालुक्यातील बोरी नदी पत्रामधील अवैध वाळू वाहतूक थांबण्याचे काही नाव घेईनात. येथे अनेक दिवसांपासून सर्रास वाळू वाहतूक सुरु असून प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाळू वाहतुकीवर प्रशासन फक्त तात्पुरती कार्यवाही करत असते. मात्र नंतर याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही.
रुपजीनगर, फाफोरे, कन्हरे या गावालगत असलेल्या नदीतून वाळूची जोरदार वाहतूक केली जाते. शिरुड मार्गे पुढील गावांना रात्रीच्या सुमारास सर्रास वाळू वाहतूक सुरु असते. तसेच नदी पात्रातून निघणाऱ्या शेतशिवारा मार्गे अनेक चोर वाटा देखील आहेत. बैलगाड्याच्या माध्यमातून नदी पात्रातून वाळू काढून एका ठिकाणी ढिगारे केले जाते. व त्या ढिगाऱ्या वरून वाळू विकली जाते. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.
रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाळू वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या आवाजामुळे नागरिकांची झोप मोड होत असते. त्याचबरोबर नदी काठावर असलेल्या गावांमध्ये लहान अँपे गाड्यांच्या माध्यमातून दिवसाढवळ्या सर्वांसमोर वाळू वाहतूक केली जाते. या वाळू वाहतूक करत असलेल्या वाहनांवर नंबर प्लेट नसते. अशी वाहने गल्ली बोळातून सुसाट जात असतात. अशा या अवैध वाळू वाहतुकीला प्रशासनाने आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.